आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ केले बरखास्त; २४ मंत्र्यांचे राजीनामे

अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी गुरुवारी अमरावती येथील राज्य सचिवालयात तीन तासांच्या बैठकीनंतर त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रिमंडळातील सर्व 24 मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे, जे वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष देखील आहेत त्यांच्याकडे राजीनामे सादर केले. मंत्र्यांचे राजीनामे संध्याकाळी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांच्याकडे पाठवले जाणार आहेत.
माहिती आणि जनसंपर्क मंत्री पेर्नी वेंकटरामय्या पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ” 2024 च्या निवडणुकीपूर्वी पक्षाच्या अनुभवी वरिष्ठांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवून पक्ष यंत्रणा मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार हे पाऊल उचलले गेले. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय संपूर्ण मंत्रिमंडळाने आनंदाने स्वीकारला आणि त्याचे स्वागत केले.”
मंत्री कोडाली नानी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री 11 एप्रिल रोजी नवीन मंत्रिमंडळ स्थापन करतील. सध्याच्या मंत्रिमंडळातील पाच ते सहा मंत्री वगळता बाकीचे सर्व नवीन चेहरे असतील. ते मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे पालन करतील आणि रेड्डी त्यांना जी भूमिका सोपवतील ते आनंदाने स्वीकारतील. मी मंत्री असो वा नसो, मी रेड्डींचा निष्ठावान सैनिक म्हणून पक्षाची सेवा करेन.”