‘…त्यांना शरद पवारांना शारिरीक इजा करायची होती’; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

मुंबई : शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत काहींनी पवारांच्या निवासस्थानाच्या दिशेने चपला देखील भिरकावल्या. या पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण केलं जात आहे. यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे.
शरद पवारांच्या निवासस्थानी जमलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अवस्थेसाठी शरद पवारांना जबाबदार धरत त्यांच्या घराच्या दिशेने चपला भिरकावल्या. यावरून पोलिसांनी कारवाई करत १०९ आंदोलक कर्मचारी आणि आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. सदावर्तेंना ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून इतर आंदोलकांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. “परवा साहेबांच्या घरी हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वच्छ नव्हता. त्यांनी शरद पवारांच्या घराची रेकी केली होती. त्यांना शरद पवारांना शारिरीक इजा करायची होती. महाराष्ट्राचं नशीब असं काही घडलं नाही”, असं आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.