‘साहित्यिकांमध्येही चिअर लीडर तयार झालेत…’- दामोदर मावजो

लातूर : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लातूरच्या उदगीर नगरीत सुरुवात झाली आहे. छत्रपती शाहू महाराज सभागृहात व डॉ. ना.य. डोळे व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते सकाळी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं आहे. तसंच उद्घाटनापूर्वी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानपीठ विजेते कादंबरीकार दामोदर मावजो यांनी उपस्थिती लावली असून यावेळी त्यांनी परखड मत मांडलं आहे.
सत्तेचा माज चढला की निर्बंध लादले जातात अशी टीका यावेळी दामोदर मावजो यांनी केली आहे. अशावेळी साहित्यिक गप्प का बसतात? असा सवालही त्यांनी विचारला. आज साहित्यिकांमध्येहेही चिअर लीडर तयार झालेत. ते सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीला गुमान प्रोत्साहन देतात अशी खंतही यावेळी त्यांनी बोलून दाखवली आहे.
मावजो म्हणाले की, “पुस्तकावरील बंदी रास्त होती का? काश्मीर फाईल्स चित्रपटात एकतर्फी चित्रण दाखवलं, अर्धसत्य आहे असं काहींचं म्हणणं असून त्यावरुन वाद सुरु आहे. माझ्या एका मित्राचं पुस्तक जाळून टाकण्यात आलं. पण तुम्हाला एखादं पुस्तक पसंत नसेल म्हणून जाळून टाकणं, बंदी आणणं हे योग्य नाही. चपखल उत्तर देण्यासाठी हवं तर दुसरी बाजू मांडणारं पुस्तक लिहावं”.
“साहित्य प्रफुल्लित ठेवायचं असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवलं पाहिजे. पण जेव्हा सत्तेला माज चढतो तेव्हा निर्बंध लादले जातात. एकाधिकारशाही बळकट करताना फॅसिझमला खतपाणी मिळतं. अशावेळी साहित्यकार हात बांधून शांत बसू शकतात का?,” अशी विचारणा देखील यावेळी त्यांनी केली.
पुढे मावजो म्हणाले, “सत्तेपुढे नांगी टाकणारे आपल्याकडे फारजण आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांची प्रतिभा कुठे गवत खाते माहिती नाही. साहित्यिकांमध्ये सत्तेत येतो त्यांच्यासाठी चिअर करणारे चिअर लीडर्स तयार झालेत ही फार दुर्दैवी बाब आहे,” विद्रोही, बंडखोर लेखक तयार झाले पाहिजेत, असंही ते म्हणाले.