‘…त्यामुळे नवनीत राणा या विषयाकडे मी गांभीर्याने पाहत नाही’- सुप्रिया सुळे

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांना नवनीत राणा यांच्याविषयी विचारलं असता त्या म्हणाल्या, नवनीत राणा यांच्यापेक्षाही राज्यात अती गंभीर विषय आहेत. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की ” महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने चालतो आणि आम्ही सुद्धा तोच विचार पुढे घेऊन जात आहोत.”
आज दिवसभर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या दिल्ली वारीची चर्चा सुरू आहे. राणा दाम्पत्याने दिल्लीत जाऊन अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे आणि खासदार नवनीत राणा यांना जेलमध्ये दिलेली वागणूक याबाबत तक्रार करण्यासाठी त्या दिल्लीमध्ये दाखल झाल्या आहेत. दरम्यान राणा यांच्या मुंबईतील घरी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाऊन आज बांधकामाची पहाणी केली. या विषयावरसुद्धा राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. नवनीत राणा यांना न्यायालयानं नोटीस पाठवली आहे. जामिनावर बाहेर असताना नवनीत राणा यांनी जामीन मिळताना न्यायालयानं घातलेल्या अटींचं पालन केलं नसल्याचं न्यायालयानं नोटीसीमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांना या विषयावर न्यायालयाला स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.
यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशामध्ये कोणालाही कुठे ही लढायचा अधिकार आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे पुरोगामी विचारांच सरकार आहे. महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकरांचे हे सरकार आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्यापेक्षाही राज्यात अती गंभीर विषय आहेत. त्यामुळे त्यांच्या विषयाकडे मी गांभीर्याने पाहत नाही.