“घटना, दृष्टी आणि मन यांच्या एकत्रीकरणातून काव्यनिर्मिती!”
!["घटना, दृष्टी आणि मन यांच्या एकत्रीकरणातून काव्यनिर्मिती!" ancer story PCMC](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/05/ancer-story-PCMC-780x470.jpg)
पिंपरी : घटना, दृष्टी आणि मन यांच्या एकत्रीकरणातून काव्यनिर्मिती होते, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी चिंचवड स्टेशन येथे रविवारी व्यक्त केले. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित आणि कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित ‘स्वप्नं बिलोरी’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी प्रा. पाटील बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक बाबू डिसोजा, ह.भ.प. रविकुमार जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. तुकाराम पाटील पुढे म्हणाले की, मानवी मनांत रुजणार्या कल्पनांच्या प्रतिबिंबांमधून कविता निर्माण होतात. त्या कवितांना स्वानुभव अन् वास्तवाची जोड लाभली तर त्यांना चिरंजीवत्व प्राप्त होते.
प्रकाशनापूर्वी वंदना इन्नाणी, उज्ज्वला केळकर, वर्षा बालगोपाल व रजनी अहेरराव यांनी कवयित्री प्रज्ञा घोडके यांच्या कवितांचे अभिवाचन केले. यावेळी प्रज्ञा घोडके म्हणाल्या की, माझ्या गावाने मला काव्यलेखनाची प्रेरणा दिली. आईवडील दोघेही शिक्षक असल्याने बालपणापासून मी एकांतात राहायला शिकले. त्यावेळी मनाच्या गाभार्यात डोकावून पाहताना अंतर्मनातील स्वप्नं शब्दरूप घेऊन प्रकट होऊ लागले. त्याला आईने खूप प्रोत्साहन दिले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नंदकुमार मुरडे म्हणाले की, जेव्हा प्रतिभेच्या भावविश्वात संवेदना झिरपू लागते; तेव्हा तिचा आस्वाद घेणारे शब्द अर्थधुंद होऊन नृत्य करू लागतात अन् त्यातून कविता जन्माला येते.
विविध संवेदनांचा परिपोष ‘स्वप्नं बिलोरी’ या कवितासंग्रहातून झालेला आहे. राजेंद्र घावटे यांनी प्रास्ताविक केले. कैलास भैरट यांनी परिचय करून दिला. पांडुरंग घोडके, निशिकांत गुमास्ते, श्रीकांत दीक्षित यांनी शुभेच्छा दिल्या.
पी.बी. शिंदे, अक्षय लोणकर, सुप्रिया लिमये, माधुरी डिसोजा, जयश्री गुमास्ते या रसिकांची या सोहळ्यात उपस्थिती होती. राज अहेरराव, दत्तात्रय घोडके, निरंजन घोडके, शरद काणेकर, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात परिश्रम घेतले. माधुरी ओक यांनी सूत्रसंचालन केले. ऐश्वर्या घोडके यांनी आभार मानले.