“प्रत्येक फुटीरांमध्ये एक ‘शिंदे’ असतो, महाराष्ट्राचं राजकारण इतकं…”, राऊतांचं मोठं विधान!

मुंबई : (Sanjay Raut On Eknath Shinde Group) तीन महिन्यांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यामुळे आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय कलगीतुरा अधिकच रंगण्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटात दाखल झालेले खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असून आज सकाळी त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी महाराष्ट्रातील शिंदे सरकारला लक्ष्य केलं. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांशी शक्यताही व्यक्त केली आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची शक्यता वर्तवणारं सूचक विधान केलं. “महाराष्ट्राचं राजकारण इतकं अस्थिर झालंय, की उद्धव ठाकरे सांगतायत ते खरं ठरणार आहे. मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे. जे म्हणतात अमुक-तमुक आमच्यासोबत आहेत, त्यांच्यातच फूट पडण्याची तयारी सुरू झाली आहे. फुटिरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो”, असं राऊत म्हणाले आहेत.
“अमोल किर्तीकर कडवट शिवसैनिक असून, ते शिवसेनेसोबतच आहेत. गजानन किर्तीकरांनी घेतलेल्या निर्णयात ते सहभागी नाहीत. त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. १०० दिवसांनी तुरुंगातून सुटल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद मला अमोल आमच्यासोबत राहिल्याचा झालाय. अशाच कडवट लोकांसोबत शिवसेनेचा प्रवास पुढे जाणार आहे. आम्हाला अनेक लोक सोडून गेले. पण गजानन किर्तीकर सोडून गेल्याचं दु:ख आम्हाला जास्त आहे”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.