आमदारकीला ३ वर्ष पूर्ण होताच आदित्य ठाकरेंचं मतदारांना भावुक पत्र; भाजपचाही समाचार

मुंबई : (Aaditya Thackeray On Shinde-Fadnavis Government) राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आज ३ वर्ष पूर्ण झाले. दरम्यान याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे. तसंच या पत्रातून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
‘जूनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करून लोक हिताचा विचार करणारे सरकार पाडलं गेलं. पण ते आम्हाला निःस्वार्थपणे काम करण्यापासून आणि आपली सेवा करण्यापासून रोखू शकणार नाहीत. आम्ही तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमासाठी काम करतच राहू आणि हेच आम्हाला पुढे ऊर्जा देत राहील,’ असं आदित्य यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
राजकीयदृष्ट्या अस्थिर झालेल्या या काळातही आपण मतदारसंघात चांगलं काम करू शकल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ‘महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून माझी निवड होऊन ३ वर्षे झाली आहेत. या ३ वर्षांत आपल्या प्रेमाने मला आशीर्वादित केले आहे आणि मी प्रार्थना करतो की हेच प्रेम आणि तुमचे आशीर्वाद कायम माझ्या सोबत राहोत.