धक्कादायक! ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी उमेदवाराची हत्या

जळगाव | Gram Panchayat Election Result 2022 – 18 डिसेंबरला राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. आज (20 डिसेंबर) या ग्रामपंचायतींचा निकाल आहे. या दरम्यान, जळगावच्या जामनेर तालुक्यात पंचायत निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये भाजपचे विजयी उमेदवार धनराज माळी यांचा दगडफेकीत मृत्यू झाला.
राज्यासह जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायतींवर भाजपने (BJP) विजय मिळविला आहे. यात जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर देखील भाजपचे वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालं आहे. या दरम्यान, जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुक निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी गावात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर पराभूत झालेल्या विरोधकांकडून तुफान दगडफेक करण्यात आली.
या दगडफेकीत भाजपचा धनराज माळी नावाचा 25 वर्षीय कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. कार्यकर्त्यांनी जखमीला तत्काळ सरकारी रुग्णालयात नेलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जळगावात खळबळ माजली आहे. दरम्यान, पोलिसांनी 20 ते 25 जणांना ताब्यात घेतलं आहे. तसंच गावामधे पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला आहे.