शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार, आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं…

मुंबई : (Aaditya Thackeray On Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात सत्तानाट्य घडलं. एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी भाजपाला साथ देत सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर शिवसेनेत फूट कोणामुळे पडली, अशा चर्चा रंगू लागल्या. काही जणांनी यासाठी भाजपला, तर काहींनी राष्ट्रवादीला जबाबदार धरलं. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी “शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे आणि मी स्वःता जबाबदार असल्याचं त्यांनी स्पष्टचं सांगितलं आहे. उद्धव ठाकरेंनी आमदारांवर आंधळा विश्वास ठेवला. आम्ही त्यांना आमचे समजत होतो. गेल्या ४० ते ५० वर्षात मुख्यमंत्र्यांकडे राहिलेलं नगरविकास खातं, आम्ही त्यांना देऊ केलं होतं,” असे सांगत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्ला केला.
“आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. आम्हाला वाटलं नव्हतं ते पाठीमागून वार करतील. सत्तेत असताना विरोधी पक्षातील नेत्यांना तडीपारीच्या नोटीसा दिल्या नाहीत. अथवा त्यांच्यावर पाळत ठेवली नाही. मात्र, आमच्या आमदारांवर पाळत ठेवली नाही, ही आमची चूक होती. राजकारण ही घाणेरडी जागा नाही,” असेही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.