“मुख्यमंत्री प्रश्नांपासून पळ काढणारे…”, आदित्य ठाकरेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
मुंबई | Aditya Thackeray On Eknath Shinde – वेदांता-फाॅक्सकाॅन, बल्क ड्रग पार्क, सॅफ्रन, टाटा एअरबस असे काही प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेले आहेत. तसंच यातील काही प्रकल्प गुजरातला गेल्यानं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. तर, हे सर्व प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळातच गुजरातला गेल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. यातच आता शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्यातील गुंतवणुकीवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी समोरासमोर चर्चेसाठी येण्याचं आव्हान दिलं होतं. त्यासाठी आदित्या ठाकरेंनी ट्विटर पोल देखील घेतला होता. तसंच आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) टीकास्त्र सोडलं आहे.
आदित्य ठाकरेंनी राज्यातील शिंदे सरकारला ‘खोटे सरकार’ म्हणत ट्विटरवर पोल घेतला आहे. ‘घटनाबाह्य’ मुख्यमंत्री ‘वेदांता फॅाक्सकॅान’ आणि इतर उद्योग महाराष्ट्राबाहेर जाण्याबद्दल माझ्याशी समोरासमोर चर्चा करण्याचं आव्हान स्वीकारतील? तुम्हाला काय वाटतं?’ असं महाराष्ट्रातील जनतेला विचारलं आहे. यावर 74 टक्के लोकांनी ‘नाही’ तर, 26 लोकांनी ‘होय’ म्हणून मत व्यक्त केलं आहे.
या ट्विटनंतर आदित्य ठाकरेंनी आणखी एक ट्विट केलं आहे. “जनतेलाही या खोके सरकारवर आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही. मुख्यमंत्री प्रश्नांपासून पळ काढणारे आहेत हे जनतेलाही ठाऊक आहे. पोलमध्ये हे स्पष्ट दिसतंय”, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.