“आधी आमदार पाठवले, मग प्रकल्प पाठवले आणि आता…”, आदित्य ठाकरेंची सरकारवर खोचक टीका

मुंबई | Aditya Thackeray – शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde Fadnavis Government) निशाणा साधला आहे. दुसऱ्या राज्यातील निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द केली. आधी प्रकल्प पाठवले आता मंत्रिमंडळ पाठवलं, अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी सरकारवर केली आहे. ते आज (23 नोव्हेंबर) एकदिवसीय बिहार दौऱ्यावर आहेत. बिहारला रवाना होण्यापूर्वी मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली.
“आजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्याची बातमी मला ऐकू आली. ही बैठक रद्द झाली तर दुसऱ्या राज्यात प्रचार सुरू आहे. राज्यात ओला दुष्काळ आहे, बेरोजगारी वाढत आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवलेली आहे. पण, या मंत्रिमंडळाला आणि खोके सरकारला मंत्रिमंडळ बैठक घेण्यासाठी एक तासही नाही. गुजरातमध्ये निवडणुकीसाठी व्यस्त आहेत. पहिल्यांदा आमदार पाठवले, मग प्रकल्प पाठवले आता मंत्रिमंडळ पाठवलं. पण महाराष्ट्रासाठी अर्धा तासही नाही. मंत्रिमंडळ गुजरातमध्ये प्रचारासाठी व्यस्त आहे. दुसऱ्या राज्यात प्रचार करावा याबाबत आक्षेप नाही पण महाराष्ट्रातही मंत्रिमंडळ बैठक महत्त्वाची आहे. ओला दुष्काळ आहे, निकष बदलण्यासाठी उपसमितीची बैठक रद्द झाली आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळानं महाराष्ट्रासाठी एक तास जरी दिला तर काही चुकीचं झालं नसतं”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची भेट घेणार आहेत. तसंच या भेटीबाबत शिवसेनेकडून एका निवेदनाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. आदित्य ठाकरेंचा बिहार दौरा सदिच्छा भेटीसाठी असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. या दौऱ्यात आदित्य ठाकरेंसोबत खासदार अनिल देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.