“हीच ती वेळ…”, आदित्य ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन

मुंबई | Aditya Thackeray Appeal To Shivsainik’s – सध्या राज्यात पावसानं चांगलंच थैमान घातलं आहे. राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली जाऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळं राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी 1 जूनपासून आतापर्यंत 102 लोकांचा बळी गेला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना पूरस्थितीबाबत आवाहन केलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये युवासैनिकांना आवाहन करताना लिहिलं आहे की, आताच्या राजकीय परिस्थितीकडं लक्ष न देता, जिथं-जिथं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा भागांत शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा. सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडंच आशेनं पाहत आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची ‘हीच ती वेळ’ आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात पावसाचा फटका जनतेसह जनावरांनाही बसला आहे. अनेक जनावरांना पावसामुळं जीव गमवावा लागलाय. आतापर्यंत मुसळधार पावसामुळं सुमारे 183 जनावरांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूरजन्य परिस्थिती पाहता राज्यात विविध भागांमध्ये एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) पथकं तैनात करण्यात आली आहेत.