ताज्या बातम्या

यंदा कार्तिकीसाठी पवार की फडणवीस? मंदिर समितीसमोर मोठा पेच

पंढरपूर | पंढरपूरच्या (Pandharpur) विठूरायाची आषाढी आणि कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्य्मंत्री यांना देण्यात येतो. युती काळात आषाढी एकादशीला मुख्यमंत्री तर कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते महापूजा होत असते. यंदा मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामुळे मंदिर समितीसमोर नवाचं पेच उभा राहिला असून कार्तिकी एकादशीला नेमक्या कोणत्या उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेला बोलावयाचे यावर मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र तोडगा न निघाल्याने अखेर विधी व न्याय विभागाचा सल्ला घेण्याचे ठरविण्यात आले.

कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर रोजी येणार असून याच्या तयारीसाठी काल मंदिर समितीची बैठक झाली. सध्या राज्याच्या राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत असून सध्या राज्याला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे दोन उपमुख्यमंत्री आहेत. कार्तिकीच्या पूजेला एकाच उपमुख्यमंत्र्यांनी बोलवावे लागणार असून गेल्या कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली होती. यावर्षी दोन उपमुख्यमंत्री असल्याने नेमके हा मान कोणाला द्यायचा या पेचात मंदिर समिती सापडली असून एकाला बोलावल्यास दुसऱ्याची नाराजी समितीला परवडणारी नाही. या मंदिर समितीची मुदत संपून जवळपास अडीच वर्षे झाली असली तरी अजून नवीन समितीबाबत कोणत्याही हालचाली नसल्याने कोणाची नाराजी नको अशीच सध्याच्या समितीची भूमिका आहे. त्यामुळेच कार्तिकी महापूजेसाठी नेमके कोणत्या उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रण द्यायचे याबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाचा सल्ला घेण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये