“…पण मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका”… उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहान!

मुंबई : मागच्या दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर गुरुवार दि. ३० रोजी राज्यात शिवसेनेत बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्त्वाखाली देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर शिंदे त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयात बदल करुन त्यांना पहिल्याच दिवशी दणका दिला आहे.
दरम्यान, शिंदे यांनी शपथविधीनंतर लगेचच कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ठाकरे सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय बदलला आहे. मुंबईतल्या आरे इथं उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडच्या निर्णयावरुन शिवसेना आणि भाजपात कायमच संघर्ष निर्माण झाला होता. फडणवीस काळात कारशेड आरेत होणार असा निर्णय होता. त्यानंतर ठाकरे सरकारनं हा निर्णाय मागे घेतला. आणि आता मेट्रोचं कारशेड आरेतच होणार आहे असा निर्णाय शिंदे यांच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे.
त्यानंतर लगेच शुक्रवार दि. ०१ रोजी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज पहिल्यांदा तुम्हाला माझा चेहरा तुम्हाला पडलेला दिसत असेल. कारण मला आज खरंच दुःख झालेलं आहे. माझ्यावर राग आहे ना तर माझ्यावर राग काढा, माझ्या पाठीत वार करा. पण माझ्या पाठीत खंजीर खुपसले, त्याप्रमाणे मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका. माझा राग मुंबईवरती काढू नका. आरेचा निर्णय नव्या सरकारनं बदलला याचं मला खरोखर दुःख झालेलं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.