“अडीच वर्षात राज्याचे झालेले नुकसान…”; अभिनेता आरोह वेलणकरचे ‘ते’ ट्विट चर्चेत

मुंबई | काल (गुरूवार) महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड राजभवनात पहायला मिळाली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी पत्रकार परिषद घेत अनपेक्षित निर्णयाची घोषणा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचं जाहीर केलं. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी गुरूवारी सायंकाळी राजभवनात पार पडला. यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसंच यामध्ये अभिनेता आरोह वेलणकरने देखील सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता आरोह वेलणकर हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तसंच तो त्याच्या ट्विटरवरुन सतत राज्यातील राजकीय घडामोडींवर ट्वीट करत असतो. अनेकदा तो भाजपला पाठिंबा देताना दिसतो. आरोहने महाविकासआघाडी सरकारच्या काळात त्यांच्यावर विविध मुद्द्यावरुन टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने ‘महाविकास आघाडीची वेळ संपत आलीय’ असं ट्वीट केलं होते. त्यानतंर आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यानं ट्विट करत खास शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप अभिनंदन. तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य यशाचे शिखर गाठो. त्यासोबतच गेल्या अडीच वर्षात राज्याचे जे नुकसान झाले आहे ते भरून काढण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असेच पुढे जात राहा, असं ट्विट आरोह वेलणकरने केलं आहे.