“बाळासाहेब नक्कीच म्हणत असतील, काय गद्दारांना…”; अरविंद सावंतांचा रामदास कदमांवर हल्लाबोल

मुंबई | Arvind Sawant On Ramdas Kadam – उद्धवजी तुम्ही शिवसेना मोठी केली नाही, शिवसेना कोकणी माणसानं मोठी केली आहे. मातोश्रीवर देखील अनेक खोके गेले आहेत ती अंदरकी बात आहे. ही सभा बाळासाहेब ठाकरे बघून म्हणत असतील की, माझा मुलगा शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामुळे बिघडला आहे, अशी टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली होती. त्यांच्या या टीकेवर आता शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“बाळासाहेब नक्कीच वरून बघत म्हणत असतील, काय गद्दारांना जन्म दिला आहे. रामदास कदम 52 वर्षे शिवसेनेत असल्याचं सांगत आहेत. त्यातील 32 वर्षे विविध पदांवरती होते, हे सुद्धा त्यांनी सांगावं. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते तेव्हा रामदास कदम पक्षात प्रवेश करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गाडीत फिरत होते. मग तुम्ही कसले निष्ठावंत. दापोली आणि खेडमधील जनतेनं तुमचा पराभव केला आहे, याची जनाची नाहीतर मनाची बाळगा. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी 12 वर्षे तुम्हाला विधानपरिषदेवर पाठवले. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते, सत्तेत असताना गृहराज्यमंत्री, प्रदूषण नियंत्रण महामंडळावर होता,” असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
पुढे अरविंद सावंत म्हणाले, “केशवराव भोसले यांच्यासोबत असताना रामदास कदम यांचा गुन्हेगारी अहवाल काढा. जसा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नारायण राणे (Narayan Rane) काँग्रेसमध्ये असताना विधासभेत मांडला होता. भाजपसोबत गेल्यावर सगळे पावन होतात, गंगेत बुडाल्यासारखे. देशातील चारही स्तंभांचा गैरवापर सत्ताधारी मंडळी करत आहेत,” असा खोचक टोला देखील सावंत यांनी लगावला.