मुंबई

ओव्हरहेड वायरवर बांबू पडला, मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली

भल्यापहाटे प्रवाशांचे हाल

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बुधवारी पहाटे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कारण, आज पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सायन आणि माटुंग्याच्या दरम्यान असलेल्या ओव्हर हेडवायरवर अचानक बांबू तुटून पडला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद मार्गावरील लोकल गाड्या खोळंबल्या होत्या.

कामावर जायला उशीर होत असल्याने अनेक प्रवाशांनी ट्रॅकवर उतरुन पायी चालत जाणं पसंत केलं. रेल्वे प्रशासनाकडून तातडीने हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र तोपर्यंत अनेक प्रवासी लोकलमधून उतरून आपल्या मार्गाकडे पायी रवाना झाले होते. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आलाय.

मागील काही दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक सातत्याने विस्कळीत होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय. मुंबईची जीवनवाहिनी म्हणून लोकल ट्रेनची ओळख आहे. दररोज लाखो मुंबईकर लोकल ट्रेनने प्रवास करतात. मुंबईच्या एका टोकावरुन दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी लोकल ट्रेनचा प्रवास उत्तम पर्याय आहे.

कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचता येतं, म्हणून मुंबईकरांची पहिली पसंती लोकल सेवेला आहे. पण हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. कारण, मागील काही दिवसांपासून लोकल ट्रेनमधील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

त्यातच तिन्ही मार्गावरील वाहतुकीत सातत्याने खोळंबा होत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. कधी पाऊस, तर कधी ओव्हर हेड वायरचं तुटणं, तर कधी सिग्नल यंत्रणेतील बिघाड यामुळे लोकलने प्रवास करणारे प्रवासी त्रस्त झाले आहेत. आज भल्यापहाटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवासी चांगलाच संताप व्यक्त करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये