“रामदास कदमांचा मेंदू सडलाय…”, उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल

मुंबई | Chandrakant Khaire On Ramdas Kadam – गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. विविध ठिकाणी केलेल्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. या दरम्यान, दापोली येथे पार पडलेल्या भाषणात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहेत. यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसंच रामदास कदमांच्या विधानानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनीही संताप व्यक्त केला आहे.
यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले, रामदास कदम यांनी जोड्याने मार खाण्याची वेळ स्वत:वर येऊ देऊ नये, असा इशारा खैरेंनी दिला आहे. तसंच राज्यमंत्रीपदी असताना रामदास कदम रेशन दुकानात जाऊन तपास करायचे, त्यांच्याकडून पैसे मिळाले की शांत बसायचे, असंही खैरे म्हणाले. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
रामदास कदम औरंगाबादमध्ये अडीच वर्षे पालकमंत्री होते. दरम्यानच्या काळात त्यांनी सगळ्यांना त्रास दिला, शिव्या दिल्या. ज्या उद्धव ठाकरेंनी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी त्यांना मंत्री केलं, त्यांच्याविरोधातच आज ते बोलत आहेत. मी ‘वन आणि पर्यावरण’ खात्याचा मंत्री होतो. मी अनेकांना मदत केली. अनेकांना याठिकाणी उद्योग सुरू करायला लावले. पण रामदास कदमांनी माझ्याच संभाजीनगरमधील अनेक कंपन्यांना नोटीसा दिल्या, त्यांना उद्योग बंद करण्यास सांगितलं, अशी टीका चंद्रकांत खैरेंनी केली आहे.
पुढे ते म्हणाले, आज हा माणूस उद्धव ठाकरेंबाबत जी टीका करत आहे, ती लाजीरवाणी बाब आहे. या माणसाचा मेंदू सडलाय की काय? असा प्रश्न पडतो. सध्या राज्यात सगळीकडे ‘जोडे मारो’ आंदोलन सुरू आहे. पण लोकं त्याला प्रत्यक्षात जोडे मारल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे रामदास कदमांनी आता माफी मागायला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असं बोलणाऱ्या माणसाला अक्कल नाही. आतापर्यंत त्याच्या फोटोवर जोड्याने मारलं आहे. पण प्रत्यक्षात जोडे खाण्याची वेळ त्यांनी स्वत:वर येऊ देऊ नये, असंही खैरे म्हणाले.