‘मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं’; पाटलांनी व्यक्त केली खंत!

मुंबई : (Chandrakant Patil in Panvel Meeting Speech) शनिवार दि. 23 रोजी भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी व कार्यसमितीच्या पनवेल येथे झालेल्या बैठकीचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी ते म्हणाले, मनावर दगड ठेवून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. त्यामुळं आपल्याला अतिशय दुःख झाल्याची खंत पाटील यांनी यावेळी बोलून दाखवली. त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले, असून विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे. दरम्यान, यावेळी महाराष्ट्र प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, सह सरचिटणीस शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय व प्रदेश स्तरावरील अनेक नेते बैठकीस उपस्थित होते.
पाटील म्हणाले, भाजप व शिवसेना युतीला २०१९ मधील निवडणुकीत बहुमत मिळूनही शिवसेनेने विश्वासघात करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. कोरोना काळात जनतेचे खूप हाल झाले. सरकारविरोधात कोणी टिप्पणी केल्यास तुरुंगात डांबलं गेलं. राज्याची विकास गती मंदावली. गेल्या अडीच वर्षांतील चित्र पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदलण्याची गरज होती आणि तसा बदल झाला. हा बदल होत असताना योग्य संदेश जाईल आणि चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल, असा एक नेता देण्याची गरज होती.
प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी फडणवीस यांच्याबद्दल गौरवोद्गार काढल्यावर पक्षनिर्णयाविरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावलं. राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं त्यांच्या समर्थकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कोणाचाही नामोल्लेख न करता पाटील म्हणाले, फडणवीस यांनी त्याग केला. मनाविरुध्द घडले तरी आपले दुःख विसरून कामाला लागा. संघटना मजबूत करा. नेत्यांनी आदेश देण्याची गरज नाही. त्यांची इच्छा पाहून निर्णय स्वीकारावा. नाहीतर मनाविरुध्द घडले की आपल्या समर्थकांना किंवा गटाला घेऊन जिल्हा परिषदेतून बाहेर पडायचं, असला प्रकार करू नये, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.