नवरात्रोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी केली ‘ही’ महत्वाची घोषणा

मुंबई | Navratri 2022 – आजपासून (26 सप्टेंबर) शारदीय नवरात्र उत्सवाला (Shardiya Navratri 2022) सुरूवात झाली आहे. यंदा या नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात मोठा उत्साह असणार आहे. कारण कोरोनामुळं गेले दोन वर्ष निर्बंध असलेला हा उत्सव यंदा निर्बंधमुक्त स्वरुपात होतोय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) महत्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं महिलांसाठी एक खास अभियान राबवलं जाणार आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्तानं राज्याच्या आरोग्य विभागामार्फत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” (Mata Surakshit Tar Ghar Surakshit) हे विशेष अभियान राबवलं जाणार आहे. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या अभिनयात घरातील माता निरोगी राहावी, जागरूक राहावी आणि समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी असा आमचा उद्देश आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व माता, भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्यक तपासणी करून घ्यावी अशी विनंती आपल्याला करीत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यभरात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबवलं जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 9 ते 12 या वेळेत 18 वर्षांवरील महिला, माता यांच्या सर्वांगीण तपासण्या केल्या जाणार आहेत. रक्त तपासण्या, जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचं नवीन बँक खातं उघडणं, गरोदर मातांचं आधारकार्ड जोडणं यांचा समावेश असल्याची माहितीही आरोग्य विभागानं दिली आहे.