ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

सेना-भाजपमध्ये गोंधळच गोंधळ

केंद्रीय श्रेष्ठींची दोन्ही पवारांशी वाढती जवळीक

पुणे | Maharashtra Politics – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपशी (BJP) जवळीक केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले आहे आणि त्याचवेळी प्रसारमाध्यमांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) एकत्र येतील अशी चर्चा होऊ लागली आहे. परिणामी, शिंदे गट आणि भाजपचे पुणे शहर आणि जिल्ह्यातील नेते गोंधळले आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४० जागा जिंकण्यासाठी भाजपने अजित पवार यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले, शिवाय मंत्रिपदे त्यांना हवी तशी दिली. अजित पवार यांना मिळणारे झुकते माप आणि पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची संभाव्य मैत्री याचा परिणाम काही नेत्यांवर थेट होणार आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि भाजप नेत्यांचा समावेश आहे. शिंदे- फडणवीस मंत्रिमंडळात अजित पवार आले. त्यापाठोपाठ इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांनी अजित पवार कॅम्प गाठला. आता हर्षवर्धन पाटील यांचे काय होणार, असा पहिला प्रश्न चर्चेला येऊ लागला. काँग्रेस पक्षातून हर्षवर्धन पाटील दोन-अडीच वर्षांपूर्वी भाजपमध्ये आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्यावर भरणे विधानसभेचे उमेदवार झाले तर, पाटील यांचे भवितव्य काय, असा प्रश्न आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुरंदरमधील कट्टर समर्थक विजय शिवतरे यांचीही पंचाईत झाली आहे. शरद पवारांच्या राजकारणाचे प्रखर टीकाकार म्हणून शिवतरे महाराष्ट्रात ओळखले जातात. मागील विधानसभा निवडणुकीत शिवतरे यांचा पराभव झाला. त्यात अजित पवार यांचा वाटा मोठा होता. मुख्यमंत्रिपदी शिंदे आल्यानंतर शिवतरे उत्साहाने कामाला लागले, पण आता या नवीन बदलात शिवतरे यांना अजित पवारांशी जमवून घेणे शक्य होईल का? शिंदे यांचे समर्थक आणि मावळते खासदार श्रीरंग बारणे यांनाही राजकीय हालचाली वेगाने कराव्या लागणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार सक्रिय झाले असून, ते मावळ मतदारसंघात उमेदवारी मागतील की, बारणे यांना ‘बाय’ देतील, याकडे लक्ष लागले आहे.

पुणे शहरात वडगाव शेरी मधील आमदार सुनील टिंगरे आणि हडपसरमधील आमदार चेतन तुपे हे अजित पवार गटात सामील झाले आहेत. त्यामुळे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक (वडगाव शेरी) आणि योगेश टिळेकर (हडपसर) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. टिंगरे आणि तुपे यांना उमेदवारी देण्यासाठी अजित पवार आग्रही राहातील, हे अस्वस्थतेचे कारण आहे. शिंदे गटाचे माजी नगरसेवक नाना भानगिरे हडपसरमधून आमदारकीसाठी इच्छुक आहेत. बदलत्या स्थितीत त्यांनाही आता मर्यादा आल्या आहेत.

आता बारामती कोणाची?

महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले होते. पालिकेची सत्ता भाजपने पाच वर्षे एंजॉय केली. यापुढे मात्र, अजित पवार समर्थक वाटेकरी असतील, या शक्यतेने भाजप कार्यकर्ते खट्टू झाले आहेत.

भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूकप्रमुख म्हणून आमदार राहुल कुल यांना नेमले आहे. त्यादृष्टीने कुल यांनी कामही सुरू केले आणि अचानकपणे अजित पवार, शिंदे-फडणवीस यांच्याबरोबर सत्तेत येऊन उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार यांचाच शब्द आता जिल्ह्यात प्रमाण मानला जाईल, या शंकेने कुल यांचे समर्थक गोंधळले आहेत. अलीकडेच कुल यांच्यावर शिवसेना (उबाठा) गटातून आरोप केले जात आहेत, त्यामागील बोलविता धनी कोण, याचीही चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये