नागपूर | Winter Session 2022 – आज (20 डिसेंबर) राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. तर दुसरीकडे हिवाळी अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले आहेत. विरोधकांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातही घोषणाबाजीने केली. विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सराकारनं उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील विकासकामांना स्थगिती दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरून अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात खडाजंगी झाली.
विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला. त्यानंतर सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदारांनी वेलमध्ये उतरत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी. स्थगिती सरकार हाय हाय. 50 खोके एकदम ओके”, अशा घोषणा विरोधकांकडून यावेळी देण्यात आल्या.
या दरम्यान, अजित पवारांनी स्थगितीच्या मुद्द्यावरून आक्षेप घेतला असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यावर खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं. “तुम्ही सात सात वेळा निवडून आलात. आम्ही कमी वेळा निवडून आलो आहोत. पण, काही गोष्टी आम्ही तुमच्याकडूनच शिकलो. ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली सरकार आलं आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तेव्हा आमची सगळी विकासकामं रोखण्याचं काम तुम्ही केलं होतं”, असं फडणवीस म्हणाले.
“जरी तुम्ही आमच्यावर अन्याय केला असला, तरी आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही. आवश्यक त्या स्थगित्या उठवल्या आहेत. तरतुदी जिथे जास्त आहेत, तिथल्या स्थगित्या कायम ठेवल्या आहेत. त्यासंदर्भातही लवकरच योग्य निर्णय आम्ही घेऊ. आवश्यक असेल तिथे सत्तारुढ पक्ष आहे की विरोधी पक्ष आहे असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. गरज असेल तर मी तुम्हालाही त्याची माहिती पाठवतो. कुणावरही अन्याय करण्याचं कारणच नाही”, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले, “तुम्ही माझ्या स्वत:च्या मतदारसंघातली कामं रोखली होती. भाजपच्या लोकांना अडीच वर्षं एक नवा पैसा तुम्ही दिला नाही. पण आम्ही बदल्याची भावना ठेवली नाही. ज्या काही स्थगित्या आणल्या होत्या त्यातल्या 70 टक्के स्थगित्या आम्ही उठवल्या आहेत. ३० टक्के स्थगित्या यासाठी कायम ठेवल्या आहेत, की शेवटच्या काळात वाटप करताना तरतुदीचा कुठलाही नियम पाळण्यात आला नाही. जिथे 2 हजार कोटींची तरतूद आहे तिथे 6-6 हजार कोटी रुपये वाटलेत. त्याच्या वर्क ऑर्डर दिल्या आहेत. हे पैसे कुठून आणायचे? त्यामुळे आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपय्या अशी अवस्था असेल, तर तशा प्रकारे हा निधी मंजूर होईल”, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली.