“नेतृत्वाने ‘उपमुख्यमंत्री’ व्हायला सांगितलं, तो माझ्यासाठी धक्का होता”; फडणवीसांची जाहीर कबुली
मुंबई : (Devendra Fadnavis On Eknath Shinde) महाराष्ट्रात झालेल्या २०१९मधील विधानसभा निवणुकांपासून राज्याचं राजकारण प्रचंड अस्थिर झालं आहे. निवडणुकांनंतर अनपेक्षितपणे झालेली महाविकास आघाडी, नंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड आणि आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेदेखील सत्तेत सहभागी झाल्याने राजकारण ढवळून निघालं आहे.
अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात एक गौप्यस्फोट केला आहे. ‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, ही कल्पना मीच माझ्या पक्षाकडे मांडली. या नव्या सरकारमधून बाहेर राहण्याचा माझा विचार होता. मात्र मला आमच्या नेतृत्वाने उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं, तो माझ्यासाठी धक्का होता,’ असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील, ही घोषणा पत्रकार परिषदेत मी स्वत: केली. तेव्हा माझ्या चेहऱ्यावर जराशीही नाराजी नव्हती, तर माझ्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद होता. मात्र माझा हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण घरी गेल्यानंतर मला आमच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं की, तुला उपमुख्यमंत्री व्हावं लागेल. हा माझ्यासाठी धक्का होता,’ अशी कबुली त्यांनी दिली आहे.