ताज्या बातम्यारणधुमाळी

उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर येणार एकत्र?; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ते कितीही वेळा एकत्र आले तरी…”

पंढरपूर | Devendra Fadnavis – गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. तसंच दोन्ही नेते लवकरच फोनवरून चर्चा करणार असून यावर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या युतीसंदर्भात टीका केली आहे. ते पंढरपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी काल (3 नोव्हेंबर) संध्याकाळी पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर खोचक शब्दांत टीका केली. ठाकरे आणि आंबेडकर खरोखर एकत्र येतील तेव्हा बघू असं फडणवीस यावेळी म्हणाले.

“एकमेकाला पाण्यात पाहणारे, विरोध करणारे, ज्यांचे विचार कधीच पटले नाहीत, विचारधारा एक नाही ते आमच्याविरोधात एकत्र येत असतात. ते कितीही वेळा एकत्र आले तरी त्यांचा समर्थ मुकाबला करण्यास भाजप नेहमीच खंबीर आहे. भाजप यापुढेही त्याच ताकदीनं मुकाबला करणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले, “पंतप्रधानांनी 2 लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले असून, त्यातील काही प्रकल्प सुरु झाले आहेत. निवडणुका आल्यावर ढोंगं करणारे, सोंगं घेणारे आम्ही नाही. आम्ही पाचही वर्षं काम करणारे आहोत,” असं उत्तर त्यांनी शिवसेनेच्या टीकेला दिलं आहे. महाराष्ट्रासाठी प्रकल्प मंजूर होत असल्यानं निवडणुका लवकरच जाहीर होतील, अशी टीका शिवसेनेनं केली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये