गुवाहाटी विमानातळावरूनच एकनाथ शिंदेंनी सांगितले सत्ता स्थापनेचं गणित!

गुवाहाटी/मुंबई : (Eknath Shinde On Shivsena) सोमवार दि. २० रोजी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रासोबत देशात राजकारण ढवळून निघाले आहे. सुरत नंतर एका आठवड्याहून अधिक काळ गुवाहाटीमध्ये घालवल्यानंतर अखेर बंडखोर एकनाथ शिंदे आणि इतर आमदार गोव्याकडे रवाना झाले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आसाम आणि गुवाहाटी येथील नागरिकांचे आभार मानले.
दरम्यान, गोव्याला रवाना होण्यापुर्वी शिवसेनेसोबत बंडखोरी करुन आठ दिवसांपासून गुवाहाटीला थांबलेल्या आमदारांनी आसाममधील सुप्रसुद्ध देवस्थान माँ कामाख्या देवीचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. सर्व आमदारांनी अगदी मोकळेपणानं दर्शन घेतले. त्यामुळे कोणत्याही आमदाराला येथे बळजबरी आणले गेले नसल्याचा पुनुरुच्चार एकनाथ शिंदेंनी यावेळी माध्यमांसमोर केला आहे.
बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्त्ये दिपक केसरकर यांनी सांगितले होते की, शिंदे आणि फडणवीस हे युतीचा फाॅर्मुला ठरवणार आहेत. त्यावर त्यांना विचारलं असता शिंदे म्हणाले, मुंबईत दाखल झाल्यानंतर आम्ही विश्वासदर्शक ठरावामध्ये सहभागी होऊ. त्यानंतर आमच्या आमदार गटाची बैठक पार पडेल. त्यानंतर आमची पुढील रणनीती काय असेल याबद्दल निर्णय घेतला जाईल. आम्ही बंडखोर नाही आम्ही शिवसेना आहोत असे शिंदे म्हणाले.आम्ही बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे त्यांचं जे धोरण आहे ते पुढं नेण्याचं काम करत आहोत. यावेळी आम्ही राज्याच्या विकासासाठी काम करणार असल्याचं म्हटलं आहे. युतीची पुढील रणनिती गोव्यात ठरणार असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितले.