मातोश्रीवर जाणार का? एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य!

मुंबई | Eknath Shinde’s Suggestive Statement – काल (गुरूवार) महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड राजभवनात पहायला मिळाली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी पत्रकार परिषद घेत अनपेक्षित निर्णयाची घोषणा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचं जाहीर केलं. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी गुरूवारी सायंकाळी राजभवनात पार पडला. एकनाथ शिंदे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत.
या शपविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्व विचारसरणीचा आणि आनंद दिघे यांच्या शिकवणुकीचा विजय असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गुरूवारी रात्री उशिरा गोव्यात पोहोचले आणि पणजीतील ताज हॅाटेलमध्ये त्यांनी बंडखोर आमदारांची भेट घेतली. यावेळी आमदारांनी एकनाथ शिंदेंचं जंगी स्वागत केलं.
शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यातच आहेत तसंच ते बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईला येतील. यादरम्यान शिंदे म्हणाले, आमच्याकडे (भाजप आणि बंडखोर) 175 आमदार असल्याने फ्लोअर टेस्ट ही केवळ औपचारिकता आहे आणि ती आम्ही सहज जिंकणार आहे. “आमच्याकडे 175 चा आकडा आहे, त्यामुळे चित्र स्पष्ट आहे”. दरम्यान तुम्ही मातोश्रीवर जाणार का, याबाबत प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले, मी ‘मातोश्री’ला भेट कधी देणार हे वेळ आल्यावर लोकांना कळेलच.