“मोदींना संपवलं तरच…”, काँग्रेस नेत्याचं खळबळजनक विधान

जयपूर | Sukhjinder Singh Randhawa On PM Narendra Modi – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबाबत राजस्थान काँग्रेसचे (Congress) प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा (Sukhjinder Singh Randhawa) यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. जर मोदींना संपवलं तरच भारत वाचू शकेल, असं वक्तव्य सुखजिंदर सिंह रंधावा यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसंच रंधावा यांच्या विधानानंतर भाजप (BJP) नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
सुखजिंदर सिंग रंधावा यांनी एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी गटबाजी संपवली पाहिजे. आपला देश वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींना राजकीय दृष्ट्या संपवलं पाहिजे. मोदी संपले तरच, भारताची भरभराट होईल. अन्यथा देश उद्ध्वस्त होईल. अदाणींशी (Gautam Adani) आपली लढाई नसून भाजपशी आहे. जर भाजपला संपवलं, तर अदाणी आणि अंबानीही संपतील.”
“जसं ब्रिटीशांनी भारतात आल्यावर ईस्ट इंडिया कंपनीला व्यवसायासाठी आणलं. तसंच मोदींनी अदाणीला आणलं आहे. देशाला ईस्ट इंडिया कंपनीनं 200 वर्षे लुटलं आणि संपूर्ण देशावर ताबा मिळवला. आता देशाला अदाणी उद्ध्वस्त करतील आणि देशाची वाटचाल पुन्हा गुलामगिरीकडे होईल. आपल्या देशात काय होणार हे मोदी ठरवत नसून अदाणी ठरवत आहेत,” अशी टीकाही सुखजिंदर सिंग रंधावा यांनी केली.



