पालघर येथे जयपूर एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलकडून गोळीबार, चार जणांचा मृत्यू

मुंबई | Jaipur Express – पालघर येथे जयपूर एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Express) धक्कादायक घटना घडली आहे. आरपीएफ कॉन्स्टेबलने (RPF Constable) गोळीबार केला असून यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा गोळीबार जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये पहाटे पाचच्या सुमारास झाला. या गोळीबारानंतर आरपीएफ कॉन्स्टेबलला ताब्यात घेतलं आहे.
आरपीएफ कॉन्स्टेबलने केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये आरपीएफ अधिकारी आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. तर चेतन सिंह हे गोळीबार केलेल्या आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे.
राजस्थानमधून ही ट्रेन पालघरमध्ये दाखल झाल्यानंतर ट्रेनमध्ये हा गोळीबार झाला. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला असून काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर जाऊन अधिक तपास करत आहेत.