“मोदींनी थाळी वाजवून कोरोना घालवला, त्याप्रमाणे आम्ही थाळी वाजवून…”, जुन्या पेन्शन योजनेवरून कर्मचारी आक्रमक

सोलापूर | Old Pension Scheme – सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जुन्या पेन्शन योजनेसाठी (Old Pension Scheme) सरकारी कर्मचारी (Government Employee) आंदोलन करत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी चार दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. हे कर्मचारी आक्रमक झाले असून ते वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आहेत. तसंच सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत मुंडन करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
वारंवार मागणी करून देखील सरकार कोणत्याच पद्धतीची पावले उचलत नसल्यामुळं सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे मुंडन आंदोलन करण्यात आल्याचं शंतनू गायकवाड यांनी सांगितलं. तसंच सोलापुरातील महापालिकेचे कर्मचारी सध्या सरकारचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधून आपलं काम करत आहेत. तर बाकीचे सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
कर्मचारी समन्वय समितीचे समन्वयक शंतनू गायकवाड म्हणाले की, “आंदोलनाचा आज (17 मार्च) चौथा दिवस दिवस आहे. तसंच सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही काल जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला होता. तर आजपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी शासनाचा निषेध म्हणून ‘मुंडन आंदोलन’ सुरू केलं आहे. आम्हाला सरकार कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी बोलावत नाहीये. जनतेला सरकार वेठीस धरत आहे. आंदोलन करण्याची आम्हाला मुळीच इच्छा नाहीये. पण सरकारनं चर्चेसाठी आम्हाला बोलवावं, सहा महिन्यात जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करतो, असं दोन ओळींचं पत्र त्यांनी द्यावं, त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत आम्ही हे आंदोलन सोडायला तयार आहोत.”
“पण तरीही सरकारला जर जाग आली नाही तर आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून आम्ही ‘भीक मांगो’ आंदोलन करणार आहोत. मग चौथा टप्पा म्हणून आम्ही सामाजिक हित जपत ‘रक्तदान शिबीर आंदोलन’ करणार आहोत. तरीदेखील सरकारला जाग आली नाही, तर देशाचे पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) थाळी वाजवून कोरोना घालवला होता. तसंच आम्ही थाळी वाजवून पुढचा कार्यक्रम करणार आहोत,” असंही शंतनू गायकवाड यांनी सांगितलं.