पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवारांची चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी!

मुंबई | Patra Chawl Case – सध्या पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Case) प्रकरणात नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. तसंच ईडीने आरोप पत्र दाखल केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे. अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. तसंच पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहता हे प्रकरण फक्त संजय राऊत (Sanjay Raut) यांना झेपणारं आहे असं सुरूवातीपासून वाटत नव्हतं, असंही भातखळकर म्हणाले.
“मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांची एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळं मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.
यासंदर्भात त्यांनी तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्र दिलेले आहे. या पत्रावरून स्पष्ट होते की, म्हाडा जरी प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता. त्यामुळं या चौकशीच्या प्रकरणाचे धागेद्वारे हे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात असल्याचं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
मराठी माणसाला न्याय देण्याकरता आणि त्यातील खरं सत्य बाहेर येण्याकरता या संदर्भातली एक उच्चस्तरीय कालबद्ध मर्यादेची चौकशी करावी, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी या पत्राद्वारे केली आहे.