क्राईमदेश - विदेशसंपादकीय

आणखी पेटवलं जातंय मणिपूर

जात, धर्म आणि वर्ग संघर्षाचा परिपाक

या घटनेचं तात्कालिक कारण असं की, त्यांना PAMRA या उग्रवादी संघटनांनी एक धमकीच दिली की, जर आपण मिझोराममध्ये दिसाल तर एक-एक निवडून निवडून मारू. मग आम्ही विचारही करणार नाही. त्यामुळंच की काय मिझोराममध्ये राहणारे हे मैतेई अल्पसंख्याक लोक आसाम या लगतच्या राज्यात स्थलांतर करीत आहेत. ज्यात विद्यार्थी व प्रोफेसरसुद्धा आहेत. तसेच मणिपूरमध्ये राहणारे मिझोराम वर्णीय लोक मिझोरामला स्वगृही परतत आहेत.

वर्गसंघर्ष… जातसंघर्ष… धर्मसंघर्ष…
ह्या पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी. ही कीडच लागली आहे काही लोकांच्या विचारांना. सडक्या मेंदूत लागलेली सडकी कीड. कोणता चांगला विचार प्रसवणार ही सडकी कीड. काही लोक असेच सडक्या विचारांचे असतात. तेच सडके विचार प्रसवतात व त्या विचारांचा प्रसार करतात. ज्यात चांगलेही फसतात व तेही बळी ठरतात. त्यामुळं अशा घटनांना किंबहुना थांबविता येणे शक्य नाही. वर्चस्वाच्या लढाईतून हे घडत असलेलं कृत्य. त्यांना कधी चांगलं सुचणारच नाही.

धर्म, जाती आणि वर्ग. आपल्या आपल्या ठिकाणी बरोबर आहेत. हो, धर्म वाढवा ना. कुणी अडवलं, कुणी मनाई केली? जात जोपासा ना. कुणी मनाई केली? धर्माचा व बलात्काराचा संबंध नाही. जातीचा व बलात्काराचा संबंध नाही. बलात्कार करणारा हा काही कोणत्याही धर्माचा वा जातीचा वा वर्णाचा होऊ शकत नाही. तरीही कथित बलात्कार सादर करून मणिपूर काही तुरळक सडक्या विचारांच्या माणसांनी पेटवला आहे व त्याला जातीय रंग देऊन कुकी व जोमी जातीच्या स्त्रियांवरच बलात्कार केले आहेत व करीत आहेत. त्यातच कुकी व जोमी जमातीचेही समुदाय कमजोर नाहीत.

तेही बलात्काराचा बदला बलात्कारानेच घेत आहेत. स्त्री तर अशा दोन्ही समुदायांची कळसूत्री बाहुली ठरलेली आहे. त्यातील पुरुषही मारले जात आहेत आणि त्याचा व्हिडीओही व्हायरल केला जात आहे, नव्हे तर याला जातीचा रंग अगदी हुबेहूब मारला जात आहे की, मणिपूर पेटत राहावं व त्याचबरोबर आजूबाजूची राज्यं. तसाच संपूर्ण भारत देशही पेटावा अशीच चिन्हं दिसत आहेत. म्हणजेच आपल्याला मजा येईल. आपली पोळी भाजता येईल, असा देखावा. अगदी चित्रपटाला शोभेल असंच कथानक. मुळात असा हा जातीय संघर्ष आज मणिपुरातच नाही, तर आजपर्यंत देशात कित्येक ठिकाणी पाहिला. तसाच बराचसा धर्मसंघर्षही देशानं अनुभवला आहे आणि अनुभवत आहे.

महत्त्वाचं सांगायचं म्हणजे खरंच मणिपूर असे जातीय दंगलीने पेटावे का? आपण पेटू द्यावे का? भारत माझा देश असताना व सारे भारतीय माझे बांधव असताना त्या ठिकाणच्या स्त्रिया आपल्या भगिनी नाहीत का? कशाला हवेत असे जातीय संघर्ष आणि असे धर्मसंघर्ष? कशाला हवा असा हिंसाचार? यानं काय आनंद मिळतो का? अन् ज्याला आनंद मिळत असेल, त्याच्यासारखा कोणी मूर्ख नाही व त्याला या देशात राहण्याचाही काही अधिकार नाही. कारण हा देशच मुळात गौतम बुद्धांच्या विचारांचा आहे. ज्यांच्या विचारानं प्रेरित होऊन सम्राट अशोकांनी कलिंग युद्धानंतर हिंसेला पूर्णविराम दिला.

हा देश म. गांधींच्या विचारांचा आहे. ज्यांनी विना शस्त्राविना देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हा देश त्या लोकांच्या विचारांचा आहे की, ज्यांनी हसतहसत फाशी घेतली. परंतु विरोध वा हिंसा केली नाही वा हिंसक वातावरण तयार केले नाही. बलात्काराचा बदला बलात्कारानंच घेतला नाही. स्त्रियांना कधीच कळसूत्री बाहुली बनवून छळलं नाही. त्यामुळं मणिपूरच्या जनतेला विशेष सांगायचं म्हणजे हिंसा करण्यापूर्वी आठवा त्यांना की, जालियनवाला बागेत जनरल डायरच्या गोळ्यांचे भारतीय लोक शिकार झाले होते. तरीही हिंसा घडवली नव्हती वा कोणावर बलात्कार केले नव्हते. मग आजच का गरज येऊन पडली? हिंसेचा बदला हिंसा आणि बलात्काराचा बदला बलात्कारानं घेण्याची आणि असंच जर सुरू राहिलं तर आज मणिपूर पेटत आहे, उद्या देश पेटेल, यात
शंका नाही.

विशेष सांगायचं म्हणजे मुळात आज हिंसा बंद व्हावी. मणिपुरातीलच नाही तर संपूर्ण देशातील. नाही तर उद्या या देशाला काहीच अर्थ उरणार नाही व हा देश कधी कोणाचा गुलाम होईल हेही सांगणे कठीण जाईल. कारण राज्य वा देश बुडायला आपसातील वादच कारणीभूत असतात हे आपण आपल्या पूर्वजांपासूनच अनुभवलं आहे. तसा इतिहास आपण शिकलेलो आहोत, हे आपण आठवायला हवं. आपण स्वतंत्र्य आहोत तर खरंच सुखी आहोत. पारतंत्र्यात असं सुख मिळणार नाही हे तेवढंच खरं. म्हणूनच याच अनुषंगाने मणिपुरातीलच नाही तर देशातील समस्त बांधवांना माझं एवढंच म्हणणं की, पुरे झाला संघर्ष आणि जातीयवाद. आतातरी जातीयवाद व संघर्ष सोडा व संघर्षाची आग कायमची विझवा. त्यातच सर्वांचं भलं आहे. नाहीतर या देशाची राखरांगोळी व्हायला वेळ लागणार नाही, हेही कोणी विसरू नये.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये