याठिकाणी रंगांनी नव्हे तर स्मशानभूमीतील चितेच्या राखेने खेळली जाते होळी

Manikarnika Ghat Holi : फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला रंगभरी एकादशी किंवा आमलकी एकादशी असेही म्हणतात. या एकादशीला भगवान विष्णूसह भगवान शंकराच्याही पूजेलाही विशेष असे महत्त्व आहे. काशीमध्ये यासंबंधित जुनी परंपरा आहे. बाबा विश्वनाथांची नगरी असलेल्या काशीमध्ये रंगभरी एकादशीच्या दिवसापासून होळीची सुरुवात होते. शिव भक्त काशीच्या मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटावर एक आगळी वेगळी आणि विचित्र होळी खेळतात.
काशी शहराला मोक्षदायिनी नगरी म्हणून ओळखले जाते. तिथे असलेल्या हरिश्चंद्र घाट आणि मणिकर्णिमा घाटवर गेल्या कित्तेक हजार वर्षांपासून अनेक अंत्यसंस्कार झालेले आहेत. इथे रोज अनेक चिता जळत असतात. पण शोकांनी भरलेल्या या घाटात वर्षातील एक दिवस असा येतो की इथे रंगांनी नव्हे तर चितेच्या राखेने होळी खेळली जाते. रंग आणि गुलालाने नव्हे तर स्मशानभूमीतील चितेच्या राखेने होळी काशीत खेळली जाते.
काय आहे ही परंपरा?
काशीमध्ये होळी साजरी करण्याच्या परंपरेची सुरुवात भगवान शंकरापासून झाल्याचे मानले जाते. प्राचीन मान्यतेनुसार, रंगभरी एकादशीच्या दिवशी भगवान शिवाने माता गौरीला नृत्य करून काशीत आणले. त्यानंतर रंगांनी आणि गुलालाने होळी खेळली. पण स्मशानभूमीत राहणारे भूत, पिशाच, यक्ष गंधर्व इत्यादींशी त्यांना होळी खेळता आली नाही. म्हणूनच रंगभरी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी शिवजींनी स्मशानभूमीत राहणाऱ्या भूत आणि पिशाचांसह होळी खेळली. रंगभरी एकादशीपासून संपूर्ण 6 दिवस येथे होळी साजरी केली जाते. काशीतील हरिश्चंद्र घाटावर महाशमशन नाथांच्या आरतीनंतर सुरुवात होते. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे.