‘मनसे संपली अशी बोंब ठोकणाऱ्यांची आज…’; मनसेचा शिवसेना आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल

मुंबई : आज राज्यभरात हनुमान जयंतीनिमित्ताने हनुमान चालीसा पठणाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यावरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी ठाण्यातल्या सभेमध्ये पुन्हा एकदा हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्याचेच पडसाद मुंबईत पाहायला मिळत आहेत. एकीकडे मनसेकडून हनुमान चालीसा पठण आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं असताना दुसरीकडे शिवसेनेकडून देखील दादरमध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील अशाच प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटरवरून राज्यातील सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून टोला लगावला आहे. “मनसे संपली अशी बोंब ठोकणाऱ्यांची आज चांगलीच फरफट झाली. नास्तिकांच्या पक्षाला पहिल्यांदा हनुमान जयंती साजरी करावी लागली, तर नव्याने पुरोगामी झालेल्या पक्षाला महाआरती. राज साहेब, आम्हाला तुमचा अभिमान आहे”, असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.