“महाराष्ट्राच्या विकासासाठी फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं”

मुंबई – महाराष्ट्राला आता नवीन मुख्यमंत्री मिळाले आहेत, याबाबत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी आपण मंत्रिमंडळात सामील होणार नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं. मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारायला लावलं. त्यामुळे नक्की काय राजकारण झालं हे गुलदस्त्यातच राहिलं. मात्र अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या विकासासाठी फडणवीसांचा मोठा त्याग आहे त्यासोबतच त्यांना पदापेक्षा गोर-गरिबांचा विकास महत्त्वाचा आहे. त्यामुळे फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी शिंदेंना मुख्यमंत्री करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि फडणवीस यांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केल्याचं राणा म्हणाल्या.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांना खऱ्या अर्थाने मोदी, शहा आणि फडणवीस यांनी श्रद्धांजली दिली असल्याचंही नवनीत राणा म्हणाल्या.