“आदित्य ठाकरेंची एकदा नार्को टेस्ट करा, पूर्ण सत्य बाहेर येईल”- नितेश राणे

नागपूर | Nitesh Rane On Aaditya Thackeray – भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियान (Disha Salian) यांचे मृत्यू जेव्हा झाले तेव्हापासून फक्त आदित्य ठाकरेंचंच नाव का समोर येत आहे? याचा विचार करण्याची गरज आहे. इतरांच्या नावांच्या चर्चा का होत नाहीत हे समजण्याची गरज आहे, असं नितेश राणे म्हणाले. तसंच जशी श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी (Shraddha Walker Case) आफताबची नार्को टेस्ट करण्यात आली तसंच एकदा आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट (Narco Test) करा, पूर्ण सत्य बाहेर येईल, असंही राणे म्हणाले. ते विधानसभेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पुढे नितेश राणेंनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर देखील भाष्य केलं. “आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणारे राहुल शेवाळे हे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये होते. ते जेव्हा पक्षाला पेट्या पाठवत होते तेव्हा त्यांची किंमत होती. मात्र, आता त्यांनी सत्याची बाजू घेतली असल्यानं त्यांची किंमत नसल्याचं सांगण्यात येतंय.”
“आजही दिशा सालियान यांच्या मृत्यूचं प्रकरण मुंबई पोलिसांकडेच आहे. अद्यापही सीबीआयकडे वर्ग झालं नाही. त्यामुळे आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करण्याची विनंती करणार आहे. 8 जून रोजी नेमकं काय झालं, दोनवेळा तपास अधिकारी का बदलण्यात आले. या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज का गायब झाले. तसंच फ्लॅटच्या विजिटर्स बुकमधील पाने कोणी फाडली. दिशाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट बाहेर का आला नाही, या प्रश्नांची उत्तरं समोर येणं गरजेचं आहे”, असंही नितेश राणे म्हणाले.
One Comment