“एका पुरूषानं चौघींशी लग्न करणं हे…”, नितीन गडकरींचं मोठं विधान

नवी दिल्ली | Nitin Gadkari – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी समान नागरी कायद्याबाबत मोठं विधान केलं आहे. एका पुरूषाला चार पत्नी असणं हे अनैसर्गिक असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Hemant Biswas Sharma) यांनी मुस्लीम समाजातील पुरूषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असण्याला भाजपचा विरोध असल्याचं विधान केलं होतं. यालाच गडकरींनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते अजेंडा आज तकच्या कार्यक्रमात बोलत होते.
“तुम्हाला एखादा असा मुस्लीम देश माहिती आहे का जिथे दोन नागरी कायदे आहेत? एखाद्या पुरुषानं महिलेशी लग्न केलं तर ते नैसर्गिक आहे. मात्र, एका पुरुषानं चौघींशी लग्न करणं हे अनैसर्गिक आहे. मुस्लीम समाजातील पुढारलेले आणि सुशिक्षित लोक चार लग्न करत नाहीत. सामान नागरिक कायदा हा एखाद्या धर्माविरोधात नसून हा कायदा देशाच्या प्रगतीसाठी आहे,” असं नितीन गडकरी म्हणाले.
दरम्यान, “स्वतंत्र भारतात राहणाऱ्या कोणत्याही पुरुषाला पत्नीला घटस्फोट न देता तीन ते चार महिलांशी लग्न करण्याचा हक्क नाही. ही पद्धत आम्हाला बदलायची आहे. आपल्याला मुस्लीम महिलांना न्याय देण्यासाठी काम करावं लागेल,” असं हेमंत बिस्वा सरमा यांनी भाषणादरम्यान म्हटलं होतं. हेमंत बिस्वा सरमा यांनी लोकसभा खासदार बदरुद्धीन अजमल यांना लक्ष्य करत हे विधान केलं होतं.