“सरकारच्या जीआरमध्ये कोणतीही दुरूस्ती झालेली नाही, त्यामुळे…”, मनोज जरांगेंची स्पष्ट भूमिका

मुंबई | Manoj Jarange Patil – गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण केलं आहे. या पार्श्वभूमीवर काल (9 सप्टेंबर) सरकार आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळात बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्जून खोतकर यांच्याकडे एक बंद लिफाफा पाठवला होता. त्यानंतर मनोज जरांगे हे त्यांचं उपोषण मागे घेतील असं वाटलं होतं. पण जरांगेंनी उपोषण सुरूच राहणार असल्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे.
मनोज जरांगे यांनी उपोषणस्थळी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली. यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, “आम्हाला 2004 च्या जीआरचा काहीही फायदा झालेला नाही. 7 सप्टेंबरच्या शासन आदेशामध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे फेऱ्या होऊ द्या, मी देखील इथे झोपलेलो आहे. सरकारनं अर्जून खोतकरांकडे बंद लिफाफ्यात शासन आदेश पाठवला आहे. पण त्यामध्ये सरसकट मराठ्यांना आरक्षणाची दुरूस्ती झालेली नाहीये. त्यामुळे माझं आमरण उपोषण सुरूच राहील.”
“आमची भूमिका अर्जून खोतकर सरकारला कळवतीलच. तसंच ते त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करतील. आपल्याला शांततेमध्ये आंदोलन करायचं आहे. या आंदोलनाचा उग्र आंदोलनाला पाठिंबा नाही”, असंही मनोज जरांगेंनी सांगितलं.