डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास; पंतप्रधान मोदी
मुंबई : (PM Modi Mumbai Speech) गुरुवार दि. 19 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर (Mumbai Tours) आले होते. आज मेट्रोसह मुंबईच्या विकासाशी संबंधित 40 हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर बीकेसीच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना, पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे.
दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली. सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, “आज देशभरात रेल्वेला आधुनिक बनवण्यासाठी मिशन मोडवर काम सुरु आहे. मुंबई लोकल आणि महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हीटीला देखील यातून फायदा होत आहे.
डबल इंजिन सरकारला सामान्य माणसालाही तीच आधुनिक सुविधा, तीच स्वच्छता आणि त्याच विकासाच्या गतीचा अनुभव द्यायचा आहे, जो कधी फक्त साधन संपन्न लोकांना मिळत होता. यासाठी आज रेल्वे स्थानकांनाही विमानतळासारखं विकसित केलं जात आहे. आता देशातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा देखील पुनर्विकास केला जात आहेत.” देशातील आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे, असं देखील ते म्हणाले आहेत.
तत्पूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, ”देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा आज भारत मोठी स्वप्न पाहत असून ती पूर्ण करण्याची हिम्मत करत आहे. याआधी आपल्याकडे एक मोठा काळ फक्त गरिबीची चर्चा करणं, जगाकडून मदत मागणं, यावर वेळ घालवत गेला आहे. ते म्हणाले, ”स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे पहिल्यांदा होत आहे, ज्यात जगाला भारताच्या संकल्पेनेवर विश्वास होत आहे.”