मुंबई | Prakash Ambedkar – प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात काल (11 जानेवारी) बंद दाराआड अडीच तास चर्चा झाली. या बैठकीत राजकीय चर्चा झाली असून प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गटासोबत युती करू नये असा आग्रह मुख्यमंत्री शिंदेंनी केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
वंचित भाजपसोबत (BJP) कधीही गेला नाही आणि जाणारही नाही. पक्षाची भूमिका बदलेली नाही. एकनाथ शिंदेंनी भाजपची साथ सोडली तर शिंदेंसोबत जाऊ, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे-आंबेडकर युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
मी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत अनेक चर्चा झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना आमची भूमिका माहिती आहे. ज्यांच्यासोबत भाजप आहे त्यांच्याबरोबर आम्ही कधीही गेलो नाही. आरएसएस आणि भाजपविरोधातलं भांडण व्यवस्थेविरोधातलं आहे. भाजप आणि मित्रपक्षांबरोबर कोणताही समझोता नाही. जर शिंदेंनी भाजपची साथ सोडली तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंना जे फायनल करायचं असेल ते त्यांनी करावं. शिवसेनेसोबत आम्ही जायला तयार आहोत हे आम्ही उघडपणे सांगत आहोत. आमची युती झाली पण पब्लिक कमिटमेंट झाली नाही. चार भिंतीमध्ये युती कधी जाहीर करायची हे आता उद्धव ठाकरेंनी ठरवायचंय. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आमचा खिमा केला आहे. कॉंग्रेस आणि शरद पवारांना ओळखणारा नेता माझ्यासारखा दुसरा नेता नाही. काँग्रेस शिवसेनेला फसवेल त्यामुळे त्यांनी अधिक वेळ थांबू नये, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.