केंद्राच्या मान्यतेअभावी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर

युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांचा दावा
पुणे : केंद्र सरकारने मान्यता नाकारल्याने रायगडमध्ये प्रस्तावित बल्क ड्रग पार्क व औरंगाबादमध्ये प्रस्तावित वैद्यकीय उपकरणे बनविण्याचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी केला.
या संबंधी केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी खुलासा करून महाराष्ट्राला प्रकल्प का नाकारण्यात आले, याची माहिती देण्याचे आवाहन आबनावे यांनी ई-मेलद्वारे केले आहे. या संदर्भात समाधानकारक माहिती मिळाली नाही, तर बेरोजगार तरुण व युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्राच्या हक्काचे अनेक प्रकल्प गुजरातसह अन्य राज्यांत जात आहेत. हे दोन्ही प्रकल्प केंद्र सरकारने मान्यता न दिल्यामुळे इतरत्र गेल्याचे आबनावे यांनी म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात, या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राला कोणत्या नियमांतर्गत नाकरण्यात आले, सदर प्रक्रिया तसेच निवड कोणत्या मुद्द्यांच्या आधारे करण्यात आली, बाहेर गेलेल्या प्रकल्पाबद्दलची सखोल माहिती महाराष्ट्रातील जनतेला आणि बेरोजगार तरुणांना द्यावी, तसेच हे प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यास मंजुरी देण्याबाबत तत्काळ पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे.
आबनावे म्हणाले, की या दोन प्रकल्पांतील अंदाजे साडेतीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असती. त्यातून सुमारे ५० हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण झाल्या असत्या. बल्क ड्रग प्रकल्प रायगड जिल्ह्यातील रोहा आणि मुरुड तालुक्यांत येण्यासाठी महाराष्ट्राने जोर धरला होता. त्यासाठी पाच हजार एकर जमीन निश्चित केली होती.
असे असताना केंद्र सरकारने तीन हजार कोटींच्या बल्क ड्रग पार्कच्या प्रकल्पासाठी हिमाचल प्रदेश, गुजरात आणि आंध्रप्रदेशच्या प्रस्तावांना तत्त्वतः मान्यता दिली. औरंगाबादच्या ऑरिक शहरात ४२४ कोटी रुपयांचा वैद्यकीय उपकरणे पार्क उभारण्याचा महाराष्ट्राचा प्रस्ताव नाकारला आणि तमिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील प्रस्तावांना मंजुरी दिली.