वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कारभारावर शेट्टींचा पवारांना टोला म्हणाले; “मुलगा पेपर लिहिणार अन्…”
पुणे : (Raju Shetty On Sharad Pawar) पोरगा कारखाना चालवणार अन् बाप त्याचे पर्यवेक्षण करणार मग पर्यवेक्षण कसं नीट होईल. हे म्हणजे मुलगा पेपर लिहिणार आणि बाप पेपर तपासणार असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेप्रमुख राजू शेट्टी यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कारभारावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर एकदा मोर्चा काढायला पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे की नेमकं काय संशोधन केले आहे, असेही शेट्टी यावेळी म्हणाले.
कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात इथेनॉलचं उत्पादन केलं आहे. यावेळी राजू शेट्टींनी आकडेवारी वाचून दाखवली. शेतकऱ्यांना पैसे देऊन देखील कारखान्यांकडे अतिरीक्त ज्यादाचे पैसे शिल्लक राहिले आहेत. दौंड शुगर कारखान्याकडे अतिरीक्त 43 कोटी रुपये, भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याकडे 51 कोटी रुपये अतिरीक्त आहेत, तसेच कर्मवीर कारखाना इंदापूर 40 कोटी, बारामती अॅग्रोकडे 116 कोटी रुपये आणि नीरा भिमा कारखान्याकडे 30 कोटी अतिरीक्त राहिल्याचे शेट्टी यावेळी म्हणाले.
या शिल्लक राहिलेल्या पैशांचा हिशोब मागणं गरजेचं असल्याचे राजू शेट्टी यावेळी म्हणाले. हा हिशोब मागितला नाहीतर असेच राहणार आहे. ही आकडेवारी मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऑडीटनुसार दिली असल्याचे शेट्टी यावेळी म्हणाले. पण प्रत्यक्षात नेमकं काय असेल ते मला माहित नाही असेही शेट्टी म्हणाले.