लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानी दिग्गजाकडून संघाची खरडपट्टी; “तुम्हाला जिंकता येत नसेल तर, निदान…”

Ramiz Raja on Pakistan Defeat : शनिवारी दि. १४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान संघामध्ये विश्वचषकाचा सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्ताचा ७ गडी राखून लाजिरवाणा पराभव केला. त्यानंतर विश्वचषकापुर्वी पाकिस्तान संघाचे गोडवे गाणारे पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू आता संघाची खरडपट्टी काढत आहेत. रमीझ राजा यांनी देखील पाकिस्तानी संघावर ताशेरे ओढले आहेत.
रमीझ राजा म्हणाले की, “हे पाकिस्तानी लोकांच्या भावना दुखावणार आहे. जेव्हा तुम्ही भारताविरोधात खेळत असाल, तेव्हा तुम्हाला माहिती हवं की ९९ टक्के भारतीय मैदानात भारताला पाठिंबा देणारे आहेत, ज्याचा परिणाम तुमच्यावर नक्की होणार आहे. तुम्ही भारवून जाणार हे देखील मला समजतं. जर तुम्हाला जिंकता येत नसेल तर, निदान तुम्ही स्पर्धा तरी केली पाहिजे.”
भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने सुरुवात मजबूत केली होती. त्यांच्या १५२ धावसंख्येवर फक्त दोन फलंदाज बाद होते. मात्र, नंतर पाकिस्तानची अवस्था १९१ धावसंख्येवर सर्वबाद अशी झाली.
भारताला मिळालेलं हे आव्हान भारताने सहज प्राप्त केले. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा याता मोलाचा वाटा होता. त्याने पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. रोहित शर्माने ८६ धावा केल्या,ज्यात त्याच्या गगनचुंबी ६ षटकारांचा समावेश होता.