राज्यात ‘लव्ह जिहाद विरोधी कायद्या’ची रवी राणांची मागणी; म्हणाले, “श्रद्धाचा खून…”

अमरावती : (Ravi Rana On State Government) वसईतील श्रद्धा वालकर या तरुणांची तिचा प्रियकर आफताबने १८ मे 2022 रोजी गळा आवळून हत्या केली होती. तसेच तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून एक एक करत दिल्लीतील मेहरोली परिसरात असलेल्या जंगलात फेकले होते. आफताब आणि श्रद्धा हे दोघेही २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये होते. श्रद्धाच्या घरच्यांना आफताबसह असलेले तिचे संबंध मान्य नसल्यामुळे त्यांनी २०१९मध्ये त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली होती.
“श्रद्धाचा खून अत्यंत क्रूरपणे करण्यात आली. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणं, ते फ्रिजमध्ये ठेवणं आणि रोज एक एक जंगलात नेऊन फेकणं, हे सर्व धक्कादायक आहे. श्रद्धावर अत्यंत विक्रृतपणे अत्याचार करण्यात आले आहे. या घटनेचा मी निषेध करतो”, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे.
“श्रद्धाची हत्या करणाऱ्या आरोपीला थेट फाशीची शिक्षा दिली पाहिजे. ज्याप्रकारे उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहादसाठी कायदा बनवण्यात आला आहे. त्या कायद्याच्या अंमलबजावणी महाराष्ट्रात केली पाहिजे”, अशी मागणीही रवी राणा यांनी केली आहे. तसेच हा मुद्दा मी येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात करणार असल्याचेही ते म्हणाले.