भाजप-शिंदे गटात ‘राजकारण’ पेटणार? एका जागेवर दोघांचे दावे; संभाजीनगर लोकसभेमुळे वाद..

छत्रपती संभाजीनगर : (Sandipan Bhumre On Devendra Fadnavis) राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मात्र, छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) लोकसभेच्या जागेवरून भाजप (BJP) आणि (शिंदे गट) यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. भाजपकडून या लोकसभा मतदारसंघासाठी तयारी सुरु केली आहे. मात्र, हा मतदारसंघ आमचा असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत चर्चा करून येथे उमेदवार दिला जाणार असल्याचा दावा शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा जागेवरून भाजप आणि शिंदे गटात ‘राजकारण’ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

युतीत नेहमी संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला असताना भाजपकडून देखील जोरदार तयारी सुरु असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना भुमरे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरची लोकसभा मतदारसंघाची जागा आमची आहे. त्यामुळे ती आम्हीच लढणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो कोणी उमेदवार देणार तो निवडून येणार आहे. भाजप तयारी करत असेल तर तयारी सर्वच करत असतात, पण भाजप आणि आम्ही मित्रपक्ष म्हणूनच लोकसभा निवडणूक लढवणार आहे.त्यामुळे युतीत त्यांच्या वाट्याला ज्या जागा येतील त्यावर ते निवडणूक लढवतील. तसेच आमच्या वाट्याला ज्या जागा येतील त्या आम्ही लढवणार आहोत. पण छत्रपती संभाजीनगर लोकसभा आमचीच जागा असून, यावर आमचाच दावा असणार असल्याचे भुमरे म्हणाले आहेत.

शिंदे गटाचे नेते भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा मतदारसंघावर दावा केला असला तरीही, भाजपकडून देखील याच मतदारसंघासाठी जोरदार तयारी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणजे काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची जाहीर सभा संभाजीनगरमध्ये झाली. तर भाजपचे नेते तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी देखील एका बैठकीत कार्यकर्त्यांना लोकसभेच्या तयारीला लागण्याचा सल्ला दिला होता. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कराड जिल्हा पिंजून काढताना पाहायला मिळत आहे. मात्र शिंदे गटाकडून संभाजीनगरच्या लोकसभा जागेवर दावा केला जात असल्याने, युतीत ही जागा कोणाकडे जाणार यावर चर्चा रंगू लागली आहे. तर कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण आहे.

Prakash Harale: