ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्र

“नीरास्नानाचा उत्साह”

नीरा भिंवरा पडता दृष्टी
स्नान करिता शुध्द सृष्टी
अंती तो वैकुंठ प्राप्ती
ऐसे परमेष्ठी बोलिला

सातारा : संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात मंगळवारी आगमन झाले. पालखीचे सातार्‍यात आगमन होत असताना संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पादुकांना नीरा नदीच्या पात्रात दत्तघाट येथे स्नान घालण्यात आले. नंतर पालखी लोणंदच्या बाजारतळाकडे रवाना झाली. मंगळवार आणि बुधवार असा दोन दिवस पालखीचा मुक्काम लोणंदमध्ये आहे.

पावित्र्य वारीचे : माऊलींच्या पादुकास्नानाचा हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांनी नीरा नदीकाठी व दत्तघाटावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी माऊली माऊलींचा अखंड जयघोष करण्यात आला.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा म्हणजे लोणंदनगरीसाठी सर्वांत मोठा उत्सव असतो. या सोहळ्याची प्रत्येकजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. दोन वर्षे कोरोनामुळे पालखी सोहळा रद्द झाला होता. यंदा भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.

यंदा पावसाने संपूर्ण जून महिन्यात ओढ जरी दिली असली तरी तो पाऊस लवकर चालू व्हावा, असे साकडे पांडुरंगचरणी घालण्यासाठी नीरा नदीच्या पुलावर लाखो भाविक जमा झाले होते. तसेच सकाळी सात वाजल्यापासून दत्तघाटावर माऊलींच्या पादुका सोहळ्यासाठी वारकरी आणि भाविक सज्ज झाले होते. पालखी सोहळ्यात वारकर्‍यांची संख्या दुपटीने वाढली आहे.

सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी पोलिस, आरोग्य, नगरपंचायत, कर्मचारी, महावितरण, बांधकाम विभागाचे कर्मचारी सज्ज आहेत, तसेच लोणंद शहरात ठिकठिकाणी वारकर्‍यांना कोरोनाचा दुसरा डोस, तसेच बूस्टर डोस देण्याचीसुद्धा सोय करण्यात आली असून, या ठिकाणी अकरा पथके तैनात करण्यात आली आहेत. दत्तघाटावर असताना पाडेगाव हद्दीत जिल्हा परिषदेच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उदय कबुले, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, तसेच राजकीय क्षेत्रातील बरीच मंडळी उपस्थित होती. सायंकाळी चारपर्यंत वाजतगाजत ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात पालखी नीरा लोणंद येथील बाजारतळाकडे रवाना झाली. लोणंदनगरी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये