Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्र

पालखी परंपरेनुसार उरुळी कांचनलाच विसाव्यासाठी थांबणार! लोणी काळभोरच्या मुक्कामाचा निर्णय अधांतरीच ?

"संत तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा उरुळी कांचन गावात परंपरेनुसार पालखी मार्गाने विसाव्यासाठी थांबणार आहे, असे पालखी सोहळ्याच्या विश्वस्त मंडळाने आज जाहीर केले. यामुळे विठुरायाच्या भक्तांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
उरुळी कांचन : “संत तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा (Sant Tukaram Maharaj Palkhi) उरुळी कांचन (Uruli Kanchan) गावात परंपरेनुसार पालखी मार्गाने विसाव्यासाठी थांबणार आहे, असे पालखी सोहळ्याच्या विश्वस्त मंडळाने आज जाहीर केले. यामुळे विठुरायाच्या भक्तांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. आज हवेलीचे प्रांत अधिकारी संजय आसवले (Sanjay Aswale) यांच्या कार्यालयात यासंदर्भात समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत वरील निर्णयाची घोषणा करण्यात आली. मात्र, लोणी काळभोर (Loni Kalbhor) ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी येणार की नाही, याचा निर्णय अद्याप अधांतरीच लोंबकळत ठेवला आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या सोहळाप्रमुखांनी (Sant Tukaram maharaj Palkhi) १० जून ते २८ जून या दरम्यानचा पालखी सोहळ्याच्या प्रवासाचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये उरुळी कांचनचा दुपारचा विसावा परंपरेनुसार ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात न होता तो पुणे सोलापूर रोड वरच वेगळ्या पद्धतीने व्यवस्था केलेल्या ठिकाणी होईल, असे जाहीर केले होते. उरुळी कांचन व पंचक्रोशीतील संत तुकाराम महाराज प्रेमी व विठ्ठलप्रेमी वैष्णवांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

त्यानंतर ग्रामस्थांनी यासंदर्भात उरुळी कांचन येथील राममंदिरात एक बैठक घेतली व पालखी सोहळा परंपरेनुसार गावात आलां नाही तर सत्याग्रह, गावबंद आंदोलन, रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आज अखेर संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रमुखांनी पालखी सोहळा परंपरेनुसार ग्रामदैवताच्या मंदिरासमोर आरती घेऊन त्यानंतर महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर विसावा व दर्शनासाठी २ तास थांबणार आहे, असे प्रांत अधिकारी संजय आसवले यांच्यासमोर जाहीर केले आहे. यावेळी उरुळी कांचन गावाचे वतीने सरपंच राजेंद्र बबन कांचन, माजी सरपंच संतोष ह. कांचन, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब ल. कांचन, अमित कांचन हे उपस्थित होते.

दरम्यान, एकीकडे ‘‘संत तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा परंपरेनुसार उरुळी कांचनला विसाव्यासाठी थांबणार असल्याचे पालखी सोहळ्याच्या विश्वस्त मंडळाने जाहीर केले आहे. तर दुसरीकडे लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी येणार की नाही? याचा निर्णय अद्याप अधांतरीच ठेवला आहे.

लोणी काळभोर ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याच्या संदर्भात रविवारी (ता. ४) बैठक पार पडली. या बैठकीत पालखी सोहळा परंपरेनुसार विठ्ठल मंदिरात मुक्कामी न आल्यास वारकऱ्यांना कोणतेही सहकार्य न करता गाव बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ५० ते ६० वर्षांची परंपरा मोडीत काढून पालखी गावात न आणण्याचा निर्णय घेतल्याने ‘जगद्गुरू संतशिरोमणी तुकाराम महाराज’’ पालखी सोहळ्याच्या प्रमुखांवर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर म्हणाले की, पालखी सोहळा लोणी काळभोर गावातील विठ्ठल मंदिरात मुक्कामी येण्याची ५० ते ६० वर्षांपासूनची परंपरा आहे. ती परंपरा विश्वस्तांनी मोडीत काढू नये आणि पालखी गावातील विठ्ठल मंदिरातच मुक्कामी यावी, अशी विनंती केली आहे. यासंदर्भात विश्वस्त दोन दिवसात निर्णय देणार आहेत. त्यानंतर पुढची भूमिका स्पष्ट करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये