शिंदे म्हणतात, “एका बाजूला डुकरं,रेडा,कुत्रे, मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर”…

मुंबई : (Eknath Shinde On CM Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांच्या बंडाचा आज आठवा दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयात ही लढाई गेली आहे. आता या सगळ्या राजकीय गोंधळात भाजपाची थेट एन्ट्री होताना दिसत आहे. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आता रुग्णालयातून उपचार घेऊन परतले आहेत. राज्यातल्या राजकारणात आता ते अॅक्टिव्ह होताना दिसत आहेत.
या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक आवाहनात्मक पत्र गुवाहाटी येथे असलेल्या बंडखोर आमदारांना लिहले आहे. त्यात ते म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण मुंबईत या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू.
दरम्यान, या पत्रानंतर वाद कुठेतरी हा सत्तांतराचा वाद निवळेल असे वाटले असतानाच, आता तो आणखी वाढताना दिसत आहे. या आवाहनात्मक पत्राला शिंदे यांनी ट्विटद्वारे चोख उत्तर दिले आहे. ते म्हणाले, एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, वाल्याचीघाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी ‘मविआ’सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय? असा सवालच शिंदे यांनी ठाकरेंना केला आहे.