स्थानिकांच्या लढ्याला यश! नवी मुंबई विमानतळाला ‘दि बा पाटील’ यांचंच नाव

नवी मुंबई- New Mumbai International Airport : मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून राजकारण सुरु होतं. शिवसेना कार्यकर्त्यांकडून या विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी होती तर नवी मुंबईतील स्थानिकांनी डॉक्टर दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली होती. दरम्यान मनसेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. विमानतळाच्या नावचा हा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित राहिलेला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने हा विषय मार्गी लावला आहे.
मुंबईतील नवीन विमानतळ हे नवी मुंबईमध्ये होत आहे. आणि नवी मुंबई ही तेथील स्थानिकांचे पुनर्वसन करून वसवण्यात आलेली आहे. स्थानिकांच्या पुनर्वसनावेळी डॉ. दि. बा. पाटील यांनी मोठा लढा दिला होता. त्यामुळं स्थानिकांसाठी ते श्रद्धेचा विषय बनलेले आहेत. त्यामुळे तेथे तयार होणात्या विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांनी आपली मागणी पूर्ण होण्यासाठी आंदोलने देखील केली होती.
मुंबई टिकून आहे ती बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आहे आणि विमानतळाला त्यांचंच नाव असावं असं शिवसैनिकांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र आता महाविकास आघाडी सरकारने या विमानतळाला डॉ. दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे स्थानिकांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे.