ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मुख्यमंत्रिपदाची चर्चा थांबेना!

अजित पवार समर्थकांचे विधान वादात

पुणे | Maharashtra Politics – आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल, असे भाजपच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितल्यानंतरही, उपमुख्यमंत्री अजित पवारच (Ajit Pawar) मुख्यमंत्री होणार, ही चर्चा काही थांबेना झाली आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार आपल्या ८ सहकाऱ्यांना घेऊन सामील झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अजित पवार यांच्या बहुतेक मागण्या मान्य करून त्यांना उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद दिले, परंतु अजित पवार समर्थकांचे एवढ्यावर समाधान झालेले नाही. पवार लवकरच मुख्यमंत्री होणार, अशा जाहिराती, फलक त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी लावले.

पवार यांचे खंदे समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट वरून संदेश देत, पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असा आशावाद व्यक्त केला. पक्षांतरबंदी कायद्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार म्हणून अपात्र ठरतील, त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि त्या जागी पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, असे पवार समर्थकांच्या गोटातून सांगण्यात येऊ लागले. ही चर्चा वाढू लागल्याने एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ झाले. अर्थमंत्रीपद पवार यांना देऊ नये, ही शिंदे यांची मागणीही मोदी-शहा यांनी मान्य केली नाही, त्यामुळे शिंदे आणि त्यांचे समर्थक हताश झाले.

शिंदे गटाची ही मानसिकता लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा पक्षाची भूमिका स्पष्ट केली. शिंदे आमचे भावनिक मित्र असून, पवार यांच्याशी राजकीय संबंध आहेत, असे फडणवीस यांनी पहिल्यांदा सांगितले. तरीही पवार समर्थकांची मुख्यमंत्री पदाची मागणी जोर धरू लागली, तेव्हा दुसऱ्यांदा फडणवीस यांनी सांगितले की, पवार यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिलेला नाही. मंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी पवार यांना तशी कल्पना देण्यात आलेली आहे. आगामी विधानसभा निवडणुका शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील. फडणवीस यांची ही भूमिका स्पष्ट झाल्यावर मुख्यमंत्रीपदाची चर्चा थांबायला हवी होती.

पृथ्वीराज चव्हाण यांचाही दावा

काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अगदी ठामपणे सांगत आहेत की, भारतीय जनता पक्षाचे नेते शिंदे यांना बदलतील. शिंदे यांचे प्रभाव क्षेत्र मर्यादित असल्याने भाजप त्यांच्या नेतृत्वाखाली मे २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक लढणार नाही.

येत्या १० ऑगस्टला विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय द्यावाच लागेल. दिल्लीतील भाजपच्या नेत्यांकडून मला ही माहिती समजली आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण करीत आहेत.

राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव चव्हाण यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाकडे गांभीर्याने पाहिले जाते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये