…म्हणून कडाक्याच्या थंडीतही केवळ टी-शर्ट घातला; राहुल गांधींनी सांगितले यामागचे कारण

काश्मीर | काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रे’चा आज काश्मीरमध्ये समाप्त झाली. यावेळी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान आलेले विविध अनुभव लोकांना सांगितले. राहुल गांधी यांना पदयात्रेदरम्यान अनेक लोकांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी यावेळी दिले. कडाक्याची थंडी असतानाही त्यांनी संपूर्ण पदयात्रेत केवळ टी-शर्टच का परिधान केला? स्वेटर किंवा जॅकेट का परिधान केला नाही? याचं कारण राहुल गांधींनी सांगितलं.
भारत जोडो पदयात्रेतील एक किस्सा राहुल गांधी यांनी सांगितला. राहुल गांधी म्हणाले, “सकाळची वेळ त्यात कडाक्याची थंडी होती. त्यावेळी चार लहान मुलं माझ्याकडे आली. ती लहान मुलं भीक मागत होते. ते जेव्हा माझ्याजवळ आले, तेव्हा त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. कदाचित ते मजुरी सुद्धा करत असतील. म्हणून त्यांच्या अंगाला मातीही लागली होती.” “ते जेव्हा माझ्याजवळ आले, तेव्हा मी त्यांची गळाभेट घेतली. मी गुडघ्यावर बसून त्यांना मिठी मारली. तेव्हा मला जाणवलं, त्यांना थंडी वाजत होती. कदाचित त्यांना जेवण मिळालं नसावं. त्यावर मी विचार केला की, ही मुलं स्वेटर किंवा जॅकेट परिधान करत नसतील, तर मलाही जॅकेट किंवा स्वेटर परिधान केला नाही केलं पाहिजे.” हा प्रसंग राहुल गांधी यांनी सांगितला.